बेळगाव -विविध प्रश्नांवर लेखणी द्वारे आवाज उठवणे,सामाजिक कार्याला योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात. लोकशाहीचा ‘चौथा’ आधारस्तंभ तसेच जनता व लोकशाही यामधील दुवा म्हणजेच पत्रकार असल्याचे प्रतिपादन, सिने निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते डॉक्टर गणपत पाटील यांनी बोलताना केले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो.बेळगावातही बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारती श्रमजीवी पत्रकार संघ (दिल्ली) यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या बेळगाव मीडिया असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉक्टर गणपत पाटील यांच्यासह माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉक्टर गणपत पाटील यांनी, समाजातील व्यथा वेदनांना वाचा फोडण्याचे काम, त्याचबरोबर देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम पत्रकार करत असतात.देशाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. याचा विचार करून शासन आणि समाजानेही पत्रकारांच्या समस्यांचा गंभीरपणे विचार करावा असे स्पष्ट केले. परशुराम भाऊ नंदीहळी यांनीही यावेळी समयोचीत विचार मांडताना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. उपेंद्र बाजीगर यांनी यावेळी अतिथींचे स्वागत केले.श्रीकांत काकतीकर यांनी आभार मानले.वरूण कारखानीस, अमृत बिर्जे, वैष्णवी काकतीकर, हिरालाल चव्हाण,श्रीपाद काकतीकर यांसह अन्य सदस्य उपस्थित होते
#पत्रकारदिवस #आचार्यबाळशास्त्रीजांभेकर