खानापूर रोड, आर. पी.डी चौक दुसरा क्रॉस येथे मागील काही वर्षा पासून पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबत आहे. रस्त्याला दोन्ही बाजूला गटार नसल्याने भाग्यनगर वरून आलेले सर्व पाणी याठिकाणी तुंबते, थोडा जरी पाऊस झाला तरी ही समस्या निर्माण होते. याची वेळोवेळी तक्रार केल्या नंतर मागील महिन्या पूर्वी येथील रस्त्याच्या निम्या भागाचे पेवर्स बदलण्यात आले.(पण का बदलले ते समजले नाही). त्यावेळी संबंधित ठेकेदाराला याचे कारण विचारले असता त्याने उत्तर देणे टाळले होते. आता हे काम होऊन महिना सुद्धा उलटला नाही तेव्हा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. हा भाग बेळगावच्या उपमहापौरांचा वार्ड मध्ये येत असल्याने त्यांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नेहमीच साचलेल्या पाण्यातून वाहचालकाना वाट काढावी लागते. तर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण बनले आहे. तसेच याचा परिणाम या भागातील व्यापारावर होत आहे त्यामुळे व्यापारी सुद्धा त्रस्त झाले आहेत. महानगर पालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीचे बांधकाम करावे, रस्त्याची उंची वाढवून पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी सदर समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी व्यापारी आणि रहिवासी यांच्या वतीने करण्यात येत आहे.