सकाळतर्फे दिवाळी निमित्त आयोजित ‘चला किल्ले बनवूया’ या उपक्रमातील बक्षीस वितरण सोहळा कपिलेश्वर मंदिर सभागृहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य प्रायोजक आनंद अकनोजी, अजित जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
सकाळचे मुख्य जाहिरात व्यवस्थापक उदय होनगेकर यांनी किल्ला परंपरा ही केवळ कलात्मक अभिव्यक्ती नसून आपल्या इतिहासाशी जोडणारी मूल्यवान परंपरा असल्याचे सांगितले. बालचमू आणि युवकांना किल्ले बनवण्याद्वारे इतिहास, संस्कृती आणि शिवकालीन शौर्याची ओळख करून देण्याचे कार्य या स्पर्धेमुळे होते, असे त्यांनी नमूद केले.
युवा व्याख्याता साक्षी गोरल यांनी शिवरायांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे असल्यावर भर दिला. नैराश्य किंवा अडचणीच्या काळात गड-किल्ल्यांना भेट दिल्यास पुन्हा उभारी मिळते, असे त्यांनी सांगितले. कल्पनाशक्ती, मेहनत आणि ध्येयाने प्रेरित केलेल्या किल्ला स्पर्धेमुळे मुलांमध्ये कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो, असेही त्यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमात शार्दुल केसरकर यांचा पोवाडा व मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
निकाल (संक्षेप):
ग्रामीण विभाग:
- प्रथम – शिवदैवत किल्ला ग्रुप, तूरमूरी
- द्वितीय – मराठा वॉरियर्स, काकती
- तृतीय – बाल युवक मंडळ, खादरवाडी
- उत्तेजनार्थ – छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रतिष्ठान लक्ष्मी नगर, शिव समर्थ युवक मंडळ लक्ष्मी नगर
शहर विभाग:
- प्रथम – बाल शिवाजी युवक मंडळ, हट्टीहोळी गल्ली
- द्वितीय – हनुमान युवक मंडळ, अनगोळ
- तृतीय – नरवीर तालीम मंडळ, जुने बेळगाव
- उत्तेजनार्थ – जय गणेश युवक मंडळ सोनार गल्ली, शिव सम्राट युवक मंडळ शहापूर
सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.



